ढाणकी प्रतिनिधी -
नुकतेच ढाणकी बिटरगाव रस्त्यासाठी बंदी भागातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलनाची ही घटना ताजी असतानाच काल रात्री बिटरगाव पासून जवळ असलेल्या मन्याली येथील सौ नताशा अविनाश ठोके वय अंदाजे तीस वर्ष यांचा प्रसूतीसाठी ढाणकी येथे आणत असताना खराब रस्त्यांमुळे चिंचोली फाट्या जवळ अचानक वेदना होऊन गाडीतच प्रसूती वेदना होऊन व वेळेत ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात न पोहोचता आल्याने उपचाराअभावी गरोदर मातेचा व पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. काळजाला भिडणारी अत्यंत अशी दुर्देवी ही घटना असून या घटनेला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनास जबाबदार असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे. याआधीही याच रस्त्याने तीन ते चार जणांचे प्राण घेतले असून कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन व लोकप्रतिनिधी अद्यापही जागी झाले नाही. काल झालेल्या माय लेकाच्या च्या दुर्दैवी मृत्यू चे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता दुरुस्त करणार? की आणखी अशा घटनांची पुनरावृत्तीची वाट पाहणार हा मोठा प्रश्न आहे.
बंदी भागामध्ये आरोग्यसेवा कमकुवत असल्याने त्यांना ढाणकी तसेच तालुक्याच्या ठिकाणी रात्री-अपरात्री धाव घ्यावी लागते. मात्र खराब रस्त्यामुळे आपला रुग्ण वेळेत दवाखान्यात पोहोचेल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. त्यामुळे वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांनी तर याच रस्त्यावर आपले प्राण सोडले तर काही गरोदर मातांनी आपल्या बाळांना जन्म दिला. आज भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना अतिशय दुर्गम अशा बंदी भागात नागरिकांना आजही रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतो ही फार मोठी शोकांतिका आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे. एकीकडे तर समृद्धी महामार्ग सारखे मोठे प्रकल्प शासन राबवत असताना ग्रामीण रस्त्याकडे का दुर्लक्ष होते हा लोकप्रतिनिधींचा नाकर्तेपणा तर नाही ना? असा सवाल आता ग्रामीण जनता करू लागली आहे. वारंवार आंदोलने निवेदने देऊनही सदर रस्त्याचे काम होत नसल्याने बंदी भागातील नागरिक त्रस्त झाले असून आणखी किती बळी गेल्यावर हा रस्ता होईल हा प्रश्न विचारत आहे. कालच्या घटनेवरून तरी आता प्रशासनाने बोध घेऊन तातडीने या रस्त्यासाठी जनता लवकरच प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरेल यात शंका नाही.
सदर महिलेच्या मृत्यूमुळे मन्याळी गावा वर शोककळा पसरली असून मन्याळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

0 टिप्पण्या