ढाणकी प्रतिनिधी -
ग्रामस्थरावर प्रत्येक हाताला काम मिळावे, कोणीही बेरोजगार राहू नये या हेतूने शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना काढली. व कामगारांना रोजगाराची हमी दिली. या योजने अंतर्गत काम करणाऱ्या रोजगारावर देखरेख व त्यांच्या मदती साठी ग्रामरोजगार सेवक हे मानधन तत्वावर पद निर्माण केले. मात्र गेल्या काही दिवसापासून या रोजगार सेवकांना मानधन मिळाले नसल्याने त्यांचा व त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अतिशय अल्प मानधनावर हे रोजगार सेवक काम करत असूनही त्यांना वेळेवर मानधन मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. कागदोपत्री जरी ग्राम रोजगार सेवक हे पद अर्धवेळ असले तरी त्यांना पूर्ण वेळच कार्य करावे लागते. अश्या या स्थिती मध्ये मानधन कमी आणि काम जास्त अशी स्थिती आहे. कोरोना मुळे आर्थिक घडी विस्कटली असताना मुलांचे शिक्षण, आरोग्य, कपडालत्ता या सारख्या मूलभूत गरजा भागवणे सुद्धा रोजगार सेवकांना अवघड जात आहे. या संधर्भात वारंवार पात्रव्यव्हार करूनही काहीही होत नसल्याने तालुक्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामरोजगार सेवक कर्मचारी संघटना उमरखेड तालुक्याच्या वतीने जिल्हाधिकारी यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. व निवेदनात विविध मागण्या करण्यात आल्या. या वेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष धोंडू पाटील माने, उपाध्यक्ष मारोती जळके, सचिव कैलास खडसे, फाजील खान, सूर्यभान हिंगाडे, दत्ता कदम, किसन जाधव, संजय झुकझुके, गणेश चव्हाण, दिगंबर ढेपे, नारायण कदम, परसराम गाडेकर इत्यादी रोजगार सेवक उपस्थित होते.

0 टिप्पण्या