यावर्षी चांगला पाऊस होईल या आशेने शेतकऱ्यांनी महागडी बियाणे आणि खते खरेदी करून पेरण्या आटोपल्या होत्या. सुरुवातीला पिके डोलू लागली खरी, मात्र आता ऐन गरजेच्या वेळी पावसाने दडी मारली आहे. कडक ऊन आणि पाण्याचा अभाव यामुळे पिके शेतातच कोमेजू लागली आहेत. जर पुढील काही दिवसांत पाऊस आला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच कर्जबाजारी असलेला बळीराजा या विदारक स्थितीमुळे कमालीचा चिंतेत पडला आहे. पावसाअभावी केवळ शेतीच नाही, तर ढाणकी शहराची पाणी पुरवठा यंत्रणाही कोलमडली आहे. धरणातील आणि विहिरींमधील पाणी पातळी खालावल्यामुळे प्रशासनाला शहरात पाणी वाटप करताना मोठी कसरत करावी लागत आहे.सध्या ढाणकी शहरात तब्बल १५ दिवसांच्या अंतराने नळाला पाणी येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना, विशेषतः महिलांना खाजगी टँकर किंवा विहिरींवर भटकंती करावी लागत आहे. वाढत्या उन्हामुळे पाणीटंचाईची ही तीव्रता अधिकच जाणवू लागली आहे.

0 टिप्पण्या