जेवलीत पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याचा धुमाकूळ; १६ नागरिकांना घेतला चावा, ग्रामपंचायतीकडे तातडीने उपाययोजनेची नागरिकांची मागणी.



ढाणकी प्रतिनिधी :जेवली गावात बुधवारी सकाळपासून एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने धुमाकूळ घालत महिला, पुरुष आणि लहान मुलांसह सुमारे १५ ते १६ नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जखमी नागरिकांनी तातडीने सरकारी दवाखान्यात उपचार घेत अँटी-रेबीज लसीकरण सुरू केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुत्र्याने गावातील विविध भागांत फिरत अनेक नागरिकांवर अचानक हल्ला केला. काही जखमींना पुढील उपचार आणि अँटी-रेबीज इंजेक्शनसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात येणार असल्याचे समजते.

या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये मोठी धास्ती पसरली असून भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कुत्र्याच्या भीतीमुळे अनेक नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत असून विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याचा तातडीने बंदोबस्त करून गावातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे तसेच संबंधित प्रशासनाकडे केली आहे.

पावसाळ्याच्या दिवसांत भटके कुत्रे विविध ठिकाणी आश्रय घेत असतात. जखम झाल्यानंतर ती लवकर भरून न आल्यास प्राणी चिडचिडा किंवा पिसाळल्यासारखा वागू शकतो आणि समोर दिसेल त्याला चावा घेण्याची शक्यता असते. कुत्र्याचा चावा घेतलेल्या प्रत्येक नागरिकाने विलंब न करता जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तातडीने उपचार व अँटी-रेबीज लसीकरण करून घ्यावे."

डॉ. चंदा पेंडलवार 

वैद्यकीय अधिकारी  प्रा. आ. केंद्र सोनदाभी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या