पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांच्या डोळ्यात आले पाणी. ढाणकी परिसरात बहुतांश पेरण्या आटोपल्या पण पावसाचा पत्ता नाही.



 ढाणकी - तंत्रज्ञानाच्या  या काळामध्ये माणूस माणुसकी हरवत चालला आणि हळूहळू निसर्गापासून दूर होत गेला. आज माणूसच माणसाप्रमाणे वागत नसल्याने निसर्गही आता कोपला असून यामुळे मात्र  सजीव सृष्टी धोक्यात येत आहे. ढाणकी परिसरामध्ये  गेल्या आठवड्यात झालेल्या तुरळक पावसामुळे  बळीराजा सुखावून  बहुतांशी  शेतकऱ्यांनी पेरण्या आटोपल्या मात्र गेल्या चार दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. यावर्षी  मान्सून महाराष्ट्रात थोडे उशिरा धडकले यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण नियोजनच बिघडले. पेरण्या लांबणीवर गेल्या आणि आता पाऊसच न पडल्याने  शेतकरी चिंतेत आहे. महागडी बियाणे  तर शेतात टाकली  मात्र ती आता उगवेल की  नाही याची शाश्वती नाही. बाजारपेठ ही शेतकऱ्यावरून अवलंबून असते  जर शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य उत्पादन झाले तरच बाजारपेठेत पैसा खेळता राहतो आणि सर्व काही व्यवस्थित चालते.  यावर्षी  किमान पंधरा दिवसाचा उशीर पेरण्यासाठी झाल्याने पीक सुद्धा उशिराच निघेल  आणि याचा फटका नक्कीच बाजारपेठेवर पडणार आणि यामुळे पूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली जाते.  यामुळे शेतकऱ्यांसोबत आता व्यापारीही चिंतेत आहेत. जुलै महिना सुरु होऊनही अजूनही वातावरणातील उकाडा कमी झाला नाही. उष्णता वाढतच आहे आणि त्यात पावसाचा पत्ता नसल्याने नागरिकही  चिंताग्रस्त होत आहेत. शहरात अजूनही पाणीटंचाईला लोकांना सामोरे जावे लागत आहे. सद्यस्थितीला पाणी विकत घेऊन पिण्याची वेळ आहे. पाऊस पडला नसल्याने मजूरदार वर्गाला मजुरी नाही आणि त्यात भर म्हणजे पाणी सुद्धा विकत घेऊन प्यावे लागत असल्याने ढाणकी व परिसरात चिंतेचे वातावरण आहे. हे सर्व जागतिक तापमान वाढीमुळे होत असल्याचे तज्ञांचे मत असून दिवसेंदिवस ही परिस्थिती गंभीर रूप धारण करील. अजूनही वेळ गेली नसून  पर्यावरणाची समतोल राखण्यासाठी  जास्तीत जास्त वृक्ष लागवड आणि संवर्धन करणे गरजेचे असल्याचे पर्यावरण तज्ञांचे म्हणणे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या