ढाणकी -देशात सत्तांतराचे वारे वाहू लागताच त्याचा परिणाम तालुक्यातील खरूस खुर्द येथे झाला आणि प्रस्थापिताना धक्का जनतेने नवीन पोरासोरांच्या हातात सत्तेच्या चाव्या नागरिकांनी दिल्या. मात्र या सत्तेचा गावाच्या विकासासाठी कसा उपयोग करायचा याचे अज्ञान त्यांना असल्याने गावात विकासाच्या नावाने वानवा दिसून येत आहे. नवीन पोरांना सत्ता दिल्याने ते गावाचे काहीतरी भले करतील या भाबड्या आशेने जनतेने त्यांना भरघोस मताने निवडून दिले. मात्र गाव चालवण्याचा कोणताही अनुभव त्यांना नसल्याने कोणते काम करायचे आणि कोणती नाही यातच या पोरांचे दिवसा मागून दिवस निघून जात आहे. त्यामुळे गावात कोणतीही नवीन विकास काम हे निवडून आले तसें घडले नाही. यामुळे खरंच खरूसकर जनतेला यांना का निवडून दिले असे म्हणण्याची वेळ आता आली आहे. तसेच गावाची सरपंच ही एक महिला असून त्यांचा मुलगा स्वतःला सरपंच समजून गावात वावरत आहे तर उपसरपंच गाव सोडून बाहेर गावी राहत असल्याने गावाला कोणी वाली राहिला नाही.
हे पोरंसोर निवडून येण्याच्या आधी गावगाडा व्यवस्थित चालू होता. गावातील नेतेमंडळी गावाचा कारभार व्यवस्थित हाकत होती तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंचांना गावात विकास कामे कशी खेचून आणायची याचा अनुभव होता. त्यांचा तालुक्याच्या नेतेमंडळाशी असलेला सुसंवाद यामुळे गावात कामे सुरळीत होत होती. मात्र या पोरांना तालुक्यातील कोणतीही नेतेमंडळी ओळखत नसल्याने विकास कामे तर दूरच ठेवा तर साधा निधीही खेचून आणता येत नाही आहे हे खरूस चे दुर्भाग्य म्हणावे लागेल असे नागरिकांचे म्हणणे आहे. आता वेळ निघून गेली असून खरूस खुर्द वासी यांना पश्चाताप करण्या शिवाय दुसरा पर्याय राहिला नाही तसेच सत्ता ही नेहमी अनुभवी व्यक्ती कडे द्यावी लागते हा मोलाचा धडा खरूस खुर्द वासियांनी यातून घेतला आहे.
(खरूस खु ग्रामपंचायत च्या भोंगळ कारभाराची पोलखोल करणाऱ्या मालिकेतील हा पहिला भाग असून दुसरा भाग लवकरच प्रकाशित होईल?)
0 टिप्पण्या