दाऊ गाडगेवाड हिमायतनगर,
नदीकाठावरील शेतकऱ्यांना शासनाने मदत देऊन आर्थिक संकटातून बाहेर काढावे यासाठी माझे प्रयत्न सुरु आहेत. गतवर्षीपासून बळीराजा आर्थिक संकटात आला असताना या पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना केवळ लुटण्याचे काम केले आहे. यापुढे पीकविमा कंपन्यां हिंगोली लोकसभा मतदार संघात दाखल झाल्या तर त्यांना इकडे फिरू देणार नाही. असा इशारा माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले आहे.
यंदाच्या अतिवृष्टीने शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे, या नुकसानीमुळे तो पुरता खचून गेला आहे. अश्या संकटाच्या काळात त्यांना शासनाने मदतीचा हात देऊन आर्थिक संकटातून बाहेर काढणे अत्यंत गरजेचे आहे. हि बाब लक्षात ठेऊन काल हदगाव तालुक्यात नदीकाठच्या गावात तसेच संपर्क तुटलेल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. आणि आज हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठच्या गावकऱ्यांची त्यांनी भेट घेऊन थेट बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील कामारी, पिंपरी, पळसपूर, डोल्हारी, सिरपल्ली आदींसह तालुक्यातील इतर गावांना भेटी देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. आणि नुकसान भरपाईची मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण व कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्याकडे पाठपुरावा करून भरीव मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगत आर्थिक संकटात आलेल्या शेतकऱ्यांना धीर दिला आहे.
0 टिप्पण्या