महावितरणचा विस्कळीत वीज पुरवठा, स्मार्ट मीटरची सक्ती आणि सहाय्यक अभियंत्यांचा मनमानी कारभार यामुळे त्रस्त झालेल्या ढाणकीकरांचा संयम अखेर सुटला. आज सर्वपक्षीय पदाधिकारी आणि संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयावर जोरदार धडक दिली. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा यावेळी उपकार्यकारी अभियंता जाधव यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून ढाणकी शहरात महावितरणच्या कारभाराबाबत प्रचंड असंतोष आहे. सहाय्यक अभियंता राहुल नाखले हे मुख्यालयी उपस्थित राहत नसल्याने ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण होत नाही. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे नगरपंचायतीची पाणीपुरवठा योजना कोलमडली असून शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्राहकांना विविध आमिषे दाखवून स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू आहे, ज्याला नागरिकांचा तीव्र विरोध आहे. यामुळे संतप्त झालेले नागरिकांनी व तसेच राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे मतभेद बाजूला सारून शहराच्या प्रश्नासाठी आंदोलनात सहभागी झाले होते. यात प्रामुख्याने बाळासाहेब चंद्रे पाटील, सादिक शेख, अमोल तुपेकर, सुंदरकांता वासमवार, संजय सलेवाड, फिरोज भाई, बंटीभाऊ वाळके, संभाजी गोरठकर, खाज्या भाई कुरेशी, प्रशांत उर्फ जॉन्टी विनकरे, शेख जब्बार, संतोष मनतेवाड, सचिन तोटेवाड , शेख बशीर, शेख एजास, पवन वचेवाड यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 टिप्पण्या