ढाणकी प्रतिनिधी
कोरोना मुळे संपूर्ण भारत हादरला असून त्या हादऱ्याचे कंपने ढाणकी शहराला बसत आहेत. काही दिवसापूर्वी ढाणकी मध्ये 8 कोरोनाचे रुग्ण आढळल्याने संपूर्ण ढाणकी शहर 6 दिवसाचा जनता करफु पाळत आहे. ज्या गल्ली मध्ये कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळले त्या गल्ल्या प्रशासनाने सील केल्या असून तेथे पोलीस कर्मचाऱ्यांच्या राहुट्या उभ्या केल्या आहेत. सील केलेल्या क्षेत्रात कोणीही जाऊ नये व तेथील कोणीही बाहेर येऊ नये यासाठी पोलीस कर्मचारी दिवस रात्र पहारा देत आहेत मात्र तेथे त्यांना कोणतीही सुविधा मिळत नसल्याने पोलीस बांधव हैराण झाले आहेत. पोलीस राहुटी आहे तेथे काही जागी विजेची सुविधा नाही तर काही ठिकाणी पंख्याची सुविधा नाही त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना त्रास होत आहे. त्यांना शुद्ध पाणी सुद्धा काही ठिकाणी मिळत नाही आहे. आपला जीव धोक्यात टाकून पोलीस आपले रक्षण करण्यासाठी प्रतिबंध क्षेत्रात कर्तव्य बजावताना त्यांना सुद्धा कोरोना पासून वाचण्यासाठी कोणतीही सुरक्षा देण्यात आली नाही. त्यामुळे पोलिसांना सुद्धा कोरोनाचा धोका होऊ शकतो, ही शक्यता नाकारता येत नाही. आज ढाणकी शहराची लोकसंख्या अंदाजे 30 ते 40 हजार असून फक्त 28 पोलीस कर्मचारी ढाणकीत आहे. एवढ्या लोकांना कस सांभाळायाच हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. वारंवार ढाणकी साठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी होत असताना अद्याप पर्यंत ही मागणी मंजूर न झाल्याने ढाणकी येथील पोलीस कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. तरी कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना सुविधा प्रशासनाने उपलब्ध करून द्याव्या ही मागणी होत आहे.

0 टिप्पण्या